मूर्तिजापुर ता.प्रतिनिधि
भुसावळ येथील न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण प्रकरणात निर्णय देताना पत्नीचा मेंटेनन्स अर्ज नामंजूर केला असून अल्पवयीन मुलासाठी दरमहा मेंटेनन्स देण्याचे आदेश पतीस दिले आहेत.
सदर प्रकरणात अर्जदार महिलेने पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करून तसेच फौजदारी प्रक्रिया साहिते चे कलम 125 अंतर्गत स्वतःसाठी व मुलासाठी मेंटेनन्स मागितला होता. प्रकरणातील पुरावे, कागदपत्रे तसेच अर्जदार महिलेच्या उलटतपासणीतील कबुलीजबाब यांचा विचार केल्यानंतर न्यायालयाच्या निदर्शनास आले की अर्जदार महिला ही स्वतःच्या इच्छेने वैवाहिक घर सोडून गेली असल्याचे नोंदीवरून स्पष्ट झाले. तसेच कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नव्हता.
त्यामुळे न्यायालयाने अर्जदार महिलेचा स्वतःसाठी मेंटेनन्स अर्ज नामंजूर केला. मात्र अल्पवयीन मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी वडिलांची असल्यामुळे न्यायालयाने मुलासाठी दरमहा रुपये 3500/- मेंटेनन्स देण्याचे आदेश दिले. त्यामुळे सदर अर्ज अंशतः मंजूर करण्यात आला.
या प्रकरणात गैरअर्जदार यांच्या वतीने ॲड. पंकज अशोकराव जामनिक यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयासमोर अर्जदार महिला ही स्वतःच्या इच्छेने वैवाहिक घर सोडून गेली असून तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, तसेच ती स्वतः मेंटेनन्ससाठी पात्र नाही, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने प्रकरणातील पुरावे व परिस्थिती विचारात घेऊन मुलाच्या हितासाठी मेंटेनन्स मंजूर केला, मात्र पत्नीचा मेंटेनन्स अर्ज नामंजूर केला.
या निर्णयामुळे योग्य कारणाशिवाय वैवाहिक सहवास सोडणाऱ्या पत्नीला मेंटेनन्स मिळत नाही, मात्र अल्पवयीन मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी वडिलांवर राहते, हा कायदेशीर सिद्धांत पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.
*टिपणी* :
अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अनेक वेळा पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले जातात; मात्र न्यायालय पुरावे व वस्तुस्थितीच्या आधारे निर्णय देते. सदर निर्णयामुळे खोटे आरोप करून मेंटेनन्स मिळविण्याच्या प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होईल, तसेच निरपराध पतींनाही न्याय मिळू शकतो, अशी प्रतिक्रिया काही पुरुष संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
*श्रेय*:
या यशाचे श्रेय ॲड. पंकज अशोकराव जामनिक यांनी त्यांचे सिनियर अधिवक्ता ॲड. प्रशांत भडांगे यांना दिले असून, त्यांनी दिलेले योग्य मार्गदर्शन तसेच प्रकरण हाताळण्यातील प्रभावी डावपेच यामुळेच हा निकाल साध्य होऊ शकला, असे त्यांनी नमूद केले.





