“शेतकऱ्यांना फसवून प्रशासन झोपेत”; १५ मे रोजी ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्याचा एल्गार
“हक्काचा विमा द्या, नाहीतर रस्त्यावरचा संताप सरकार हादरवेल”; विमा कंपन्या, प्रशासन आणि अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा थेट आक्रोश — मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे नाही
मूर्तिजापूर ता.प्रतिनीधी
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात पिक विमा व अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा संताप आता टोकाला पोहोचला असून, भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली १५ मे रोजी ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाड्या आणि शेकडो शेतकऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा धडक इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. शासनाच्या घोषणा केवळ कागदावर राहिल्या, तर शेतकरी मात्र कर्ज, नुकसान आणि अन्यायाच्या खाईत ढकलला गेल्याचा संतप्त आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
भारतीय किसान संघाचे प्रांत उपाध्यक्ष राहुल राठी व आनंद बांगड यांच्या नेतृत्वात बहुसंख्य शेतकरी आणि संघटना आक्रमक भूमिकेत एकत्र आल्या. उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार व तहसीलदार शिल्पा बोबळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. तसेच शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनाही माहितीस्तव निवेदन सादर करण्यात आले.
मूर्तिजापूर तालुक्यातील सातही मंडळांतील शेतकरी प्रचंड आक्रोशात असून, “समित्या आदेश देतात, पण विमा कंपन्या शेतकऱ्यांना थेट नाकारतात. अधिकारी आणि कंपन्यांच्या संगनमतामुळे शेतकरी उध्वस्त झाला,” असा गंभीर आरोप करण्यात आला. “मागण्या पूर्ण होईपर्यंत रास्ता रोको मागे घेतला जाणार नाही. आता शेतकरी शांत बसणार नाही,” असा थेट इशारा देण्यात आला.
आंदोलनादरम्यान कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास संपूर्णपणे शासन व प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील, असा संतप्त आणि तीव्र इशाराही शेतकरी संघटनांनी दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.



